“१० वर्षांनंतर मला तुरुंगात टाकले तेव्हा…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Uncategorized

सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही महिन्यांपूर्वी केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. यामुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला होता. यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची सोशल मीडिया पोस्ट हे चर्चेचे कारण ठरले आहे.

   

मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही फेसबुकवर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती त्यावरुन विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या फेसबुकवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ती एका समुद्र किनाऱ्यावर पाय मोकळे करुन बसल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सागरा प्राण तळमळला हे गाणे वाजताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शनही दिले आहे.

हे वाचा:   विचित्र कपडे आणि हटके फॅशनमुळे चर्चेत असलेली उर्फी आहे कोट्यवधींची मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल चक्कर

“१० वर्षापुर्वी अंदमान तुरूंग बघितला. अंगावर काटा आला होता बघून. फक्त समुद्राचा आवाज (आणि सह कैदी कदाचित), एका बाजूला १० फुटावर छोटीशी खिडकी आणि दुसऱ्या बाजूला बॅरेकचे दार. ती कडी बघून तेव्हा जोक केला होता की ही कडी नाही कडा आहे, कुलुपाची गरज काय!१० वर्षांनंतर जेव्हा मला तुरूंगात टाकले गेले, तेव्हा तशीच कडी, बॅरेकचे दार व खिडकी एकाच बाजूला. समुद्राचा आवाज नव्हता. पण आता समुद्राकडे बघितल्यावर फक्त हेच ऐकू येते!”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे ४१ दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेयादेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती.

Leave a Reply